राष्ट्रवादी कांग्रेसच्या मागणीची केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली दखल

News34

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर शहरातून जात असलेल्या नवीन “हैद्राबाद-आदिलाबाद-कोरपना-गडचांदुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.हा महामार्ग गडचांदुर शहरातून जात असल्यामुळे गडचांदुर शहर दोन भागात विभागले जाणार आहे,त्याचा परिणाम शहराच्या विकासावर,व्यापारावर,आणि अपघात वाढण्यावर होणार आहे.

त्यामुळे गडचांदुर शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या भागावर पिल्लर असलेल्या उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यास,पुलाखालून शहराच्या दोन्ही भागातून वाहतूक सुरळीत सुरू राहील,व्यापारावर परिणाम होणार नाही,अपघात देखील टळतील,याबरोबरच माणिकगड सिमेंटकडे वळणाऱ्या मार्गाचा आणि रेल्वे मार्गावरील फाटकाचाही प्रश्न सुटेल,सोबतच राळेगाव-देवाडा या राज्य मार्गाला सुद्धा या उड्डाणपुलाचा फायदा होईल.

यासर्व मागण्यांवर सोमवार दि.२१ ऑस्ट.ला नागपुरात राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या पुढाकारातून त्यांच्या निवासस्थानी एका बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी वरील मागण्यांचे निवेदन देशाचे रस्ते-भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना राजुरा विधानसभेचे अध्यक्ष माजी जि.प.सभापती आणि गडचांदुर निवासी नेते अरुणभाऊ निमजे,चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिले. याप्रसंगी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ ताकसांडे देखील उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ या मागणीनुसार उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचे निर्देश दिले,सोबतच संपूर्ण देशात बंदिस्त भिंती असलेल्या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे शहराचे दोन भागात तुकडे पडतात अश्या असंख्य तक्रारी येत असल्याची कबुलीही दिली,आणि यापुढे पिल्लर असलेल्या उड्डाणपुलांचेच बांधकाम करण्याचे निर्देश दिले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!