Chandrapur district farmer suicide report
Chandrapur district farmer suicide report : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९) एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. रेमाजी बाबाजी देशमुख (५५, रा. मोखाळा, ता. सावली) आणि अनिल शंकर देवतळे (४३, रा. माढेळी, ता. वरोरा) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
Also Read : तहसीलदार विरुद्ध शेतकऱ्यांचा संताप
शेतकरी रेमाजी देशमुख यांची आत्महत्या (मोखाळा)
सावली तालुक्यातील मोखाळा येथील रहिवासी असलेले रेमाजी देशमुख यांच्याकडे दोन एकर शेती आहे. बुधवारी (दि. ८) त्यांचा मुलगा व सून हे दोघे सोयाबीन काढणीसाठी वाशिम जिल्ह्यात रवाना झाले होते, तर त्यांची पत्नी कांता देशमुख या गुरुवारी सकाळी दही विकण्यासाठी गडचिरोली येथे गेल्या होत्या. घरात केवळ नातवंडे असताना, त्यांची नजर चुकवून रेमाजी देशमुख यांनी घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी दही विकून घरी परतल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. Two farmers suicide in Chandrapur
या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी सावली पोलिसांना दिल्यावर ठाणेदार पुलूरवार हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
शेतकरी अनिल देवतळे यांनी केली आत्महत्या (माढेळी)
दुसऱ्या घटनेत, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील शेतकरी अनिल शंकर देवतळे यांच्याकडे आठ एकर शेती आहे. त्यांच्यावर विविध कार्यकारी संस्थेचे २ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. नेहमीप्रमाणे अनिल देवतळे हे गुरुवारी सकाळी ८ वाजता स्वतःच्या शेतात गेले. तिथे त्यांनी शेतातील घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
बराच वेळ झाला तरी अनिल देवतळे घरी परत न आल्याने त्यांचे वडील शंकर देवतळे हे शेतात गेले असता त्यांना ही घटना दिसली. त्यांनी तातडीने माढेळी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
या दोनही घटनांमुळे सावली तालुक्यातील मोखाळा आणि वरोरा तालुक्यातील माढेळी या गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.










