चंद्रपूरच्या गणेश नगरात कचऱ्याला भीषण आग, मोठा अनर्थ टळला

May 24, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: स्थानिक गणेश नगर परिसरातील मोकळ्या मैदानावर साचलेल्या कचऱ्याला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. सध्या सुरू असलेले अती उष्णतामान आणि सुटलेला वेगवान वारा यामुळे या आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ही भीषण आग शहराच्या मुख्य वस्तीत घुसण्याच्या बेतात असतानाच, स्थानिक नागरिकांनी दाखविलेले धाडस आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून शहराचा एक मोठा भाग खाक होण्यापासून वाचला आहे. (गोवंश तस्करांना पोलीस अधीक्षकांनी दिला मकोका कारवाईचा इशारा)

 

या परिसरातील मोकळ्या जागेत महानगरपालिका आणि काही नागरिकांद्वारे सातत्याने कचरा टाकला जातो. यात दगड-मातीसोबतच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कापड आणि जैविक कचऱ्याचा समावेश आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आज दुपारी १२ च्या सुमारास कुणीतरी या कचऱ्याला आग लावली. कडक ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग क्षणार्धात भडकली आणि वस्तीच्या दिशेने झपाट्याने सरकू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या घरातील पाण्याचा वापर करून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांनी दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे आगीचा वेग काहीसा मंदावला.

 

दरम्यान, अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाची गाडी काहीशी उशिरा पोहोचली, तरी त्यांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. जवळपास तासभर चाललेल्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझली नसली तरी ती नियंत्रणात आली. जर अग्निशामक दल आणखी उशिरा आले असते आणि नागरिकांनी पुढाकार घेतला नसता, तर ही आग गणेश नगर, वरोरा नाका, पत्रकार संघ कार्यालय आणि नागपूर रोड या दाट लोकवस्तीच्या परिसरात पसरली असती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असती.

 

अजूनही आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. अशा तीव्र उष्णतेच्या काळात प्लास्टिक आणि वाळलेल्या पालापाचोळ्याचा कचरा पेटल्यास संपूर्ण शहर धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागातील कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावावी आणि नागरिकांनीही सतर्क राहून शहराला अशा दुर्घटनांपासून वाचवावे, अशी जाहीर मागणी सुरेश चोपणे यांनी केली आहे.

Leave a Comment

+