chandrapur tigress captured : चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालून चार महिलांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. तालुक्यातील पवनपार तलावजवळील परिसरात शनिवारी, २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास या वाघिणीला ट्रॅन्क्विलायझर गनने डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पसरलेला प्रचंड दहशतीचा वातावरण काहीसा सुकर झाला असला, तरी या वाघिणीच्या उर्वरित चार बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक अजूनही जंगलात मोहीम राबवत आहे. (वाघाच्या हल्ल्यात ४ महिला ठार)
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनपरिक्षेत्रात २२ मे रोजी मानव-वन्यजीव संघर्षातील अत्यंत भीषण आणि काळीज हेलावून टाकणारी घटना घडली होती. जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर एका वाघिणीने अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते. एकाच दिवशी चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील सर्वात मोठी आणि गंभीर घटना मानली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच प्रशासनावर वाघाला तात्काळ जेरबंद करण्यासाठी मोठा दबाव होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तत्परतेने पावले उचलली. हल्ला करणारी वाघीण नेमकी कोणती आहे, हे शोधण्यासाठी आणि तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात तातडीने २० अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे आणि ३ मोशन सेन्सर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले. तसेच वनविभागाच्या विशेष पथकाद्वारे जंगलात गस्त वाढवून वाघिणीवर कडक पाळत ठेवण्यात आली. २३ मे रोजी रात्री वाघिणीचे अचूक लोकेशन मिळताच वनविभागाच्या पथकाने पवनपार तलावाजवळ तिला वेढा घातला आणि शूटरने अचूक डार्ट मारून तिला बेशुद्ध केले. या वाघिणीला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी नागपूर किंवा चंद्रपूर येथील रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात येणार आहे. वाघीण जेरबंद झाली असली तरी तिच्या चार बछड्यांचा शोध घेणे वनविभागासमोर आता मोठे आव्हान आहे.
Leave a Comment