चंद्रपूर – Chandrapur Employment Scheme अंतर्गत विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम चंद्रपूर येथे पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 1609 आस्थापनांनी योजनेत नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली तर नवनियुक्त कर्मचाऱ्यांना 32 नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. रोजगार निर्मिती आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. (२१ जून रोजी चंद्रपुरात नीट परीक्षा)
Chandrapur Employment Scheme कार्यक्रमात काय घडले?
प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. (८ महिन्यांचे मानधन रखडले, धानोरकरांनी दिला दिलासा)
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना श्री. जोरगेवार म्हणाले, या योजनेत नियोक्ते व कर्मचारी या दोघांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते, हे या योजनेचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. चंद्रपूरचा उत्पादन व खाणकाम केंद्र म्हणून होणाऱ्या विकासावरही त्यांनी भर दिला. ही दोन्ही क्षेत्रे श्रमप्रधान असल्याने ही योजना या प्रदेशातील स्थानिक आस्थापनांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 1609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे : कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही केवळ एक योजना नाही. तर प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांच्या आकांक्षांना बळकटी देतानाच उद्योग आणि मनुष्यबळ यांच्यात भक्कम दुवा निर्माण करणारा एक उपक्रम आहे. ही योजना एकाच वेळी दोघांनाही पाठबळ देते. आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून तितक्याच प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. जवळपास 20 लाख युवकांनी आपल्या पहिल्या नोकरीत सहा महिने पूर्ण केले असून, हा टप्पा पूर्ण केल्यानंतर सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान आधीच मिळाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
2 हजार कोटींहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. हे पाठबळ केवळ आर्थिक मदत नसून, ते देशाने आपल्या युवकांच्या परिश्रमांना दिलेली मान्यता व त्यांच्या भविष्याविषयीचा विश्वास दर्शवते. गेल्या 12 वर्षांत भारताच्या रोजगार व्यवस्थेत झालेल्या महत्त्वपूर्ण परिवर्तनाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ‘रोजगाराला सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सामाजिक संरक्षणाशी जोडण्यावर शासनाचा भर राहिला आहे’ असे ते म्हणाले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






