News34
पोंभुर्णा / पाणी पाऊस असो वा नसो, तालुक्यात विजेची समस्या नित्याचीच झाली आहे. रोजच्या रोज दिवसभरात कितीवेळा पुरवठा खंडीत होतो, हे सांगणेसुध्दा कठीण होऊन बसले आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विद्युत पुरवठा विभागाविषयी समस्या जाणून घेऊन शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) पोंभुर्णा शिवसेनेनेच्या वतीने येथील विद्युत वितरण कंपनी ला निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बल्लारशाह विभागाअंतर्गत उपविभाग पोंभुर्णा येथील ३३ केव्ही सबस्टेशन मधील आष्टा,घोसरी, देवाडा खुर्द, उमरी पोतदार,या क्षेत्रासाठी विद्युत तंत्रज्ञ (लाईनमेन) नसून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.त्यामुळे ते कर्मचारी त्यांचा विभाग सांभाळून अतिरिक्त दिलेल्या विभाकडे दुर्लक्ष करीत असल्याने याचा नाहक त्रास शेतकरी व अनेक गावातील नागरिकांना होत आहे.नेमका कोणत्या वायरमनकडे भार सोपविण्यात आला आहे, हेच माहित नसल्याने संपर्क कोणाशी करायचा हाच मोठा प्रश्न आहे.
देवाडा क्षेत्रात देवाडा खुर्द,जामतुकुम, जामखुर्द, जाम रयतवारी,रामपूर दीक्षित,चेक पोंभुर्णा असे सहा गावांचा तर आष्टा क्षेत्रात आष्टा, वेळवा माल, सेल्लुर नागरेड्डी,चेक आष्टा, सोनापूर,चेक नवेगाव,असा सहा गावांचा तर उमरी क्षेत्रात उमरी पोतदार,घनोटी नं.१,घनोटी नं.२, विहिरगाव, आंबेधानोरा,सातारा तुकुम,सातारा भोसले,सातारा कोमटी, आंबईतुकूम असा नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.धान व मिरचीची रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना रोपे जगवण्यासाठी मजुराकरवी डोक्यावर घागर घेऊन दिवसभर पाणी घालावे लागत आहे. शेतातील मोटारपंप कुचकामी ठरत आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, डीओ जाणे,फेज जाणे,अश्या अनेक समस्या निर्माण होत असल्याचे शेतकरी व सामान्य नागरिक मेताकुटीस आला आहे.
म्हणून या सर्व समस्यांचे निराकरण करता यावे म्हणून शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) रोजी पोंभूर्णा शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,बल्लारपुर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,युवासेनेचे रजत ढोंगे, सुमित मानकर,राहुल गगपल्लीवार,सुनील कावटवार, समीर बुरांडे, वासुदेव गोरंतवार,विनोद जाधव, वेदांत आगरकर,विश्वास मडावी,सचिन मडावी,एकनाथ कुळमेथे, अरविंद कोडापे,इत्यादी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.