Chandrapur Child Safety - अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी शिवसेनेचे निवेदन

चंद्रपुरात नेमकं काय घडतंय? पालक चिंतेत; महिला-बाल सुरक्षेवर शिवसेना आक्रमक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 29, 2026

चंद्रपूर : (Chandrapur Child Safety) चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना निवेदन देत बेपत्ता मुलींचा युद्धपातळीवर शोध घेण्याची मागणी केली. तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणे, संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढविणे आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे पालकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद आमदार डॉ. मनीषा ताई कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व गोमती पाचभाई यांच्या पुढाकाराने शिवसेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना निवेदन देण्यात आले. (वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही, सर्पदंशाने ६ वर्षीय मुलाचा मृत्यू)

Chandrapur Child Safety प्रकरणात शिवसेनेने कोणत्या मागण्या केल्या?

निवेदनात राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तसेच चंद्रपूर शहरातील प्रकाश नगर, महाकाली कॉलरी परिसरातून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा युद्धपातळीवर शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन करावे, संबंधित दोषींना तातडीने जेरबंद करून कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मोरवा येथील पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या प्रयत्नातील आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये कठोरात कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणीही करण्यात आली.

शिवसेनेने निवेदनाद्वारे बेपत्ता मुलींच्या शोधासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणे, सीसीटीव्ही, सायबर तंत्रज्ञान तसेच शेजारील जिल्हे व राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून शोधमोहीम अधिक तीव्र करणे, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविणे आणि संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, अशा विविध मागण्या केल्या. महिला व बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी मेघा अक्केवार, मंगला कन्नमवार, संतोषी कडालवार, माधवी मेंढे, माला दिकोडवार, सोनाला अक्केवार, मनीषा यामावार, पौर्णिमा मुरमुरवार, सपना माडुरवार, पूनम धकाते, संगीता मून, विद्या पणपलिया, योगिता चात्रेश्वरवार,अॅड. मृणालीनी रागीट , वनिता आसुटकर , अॅड.अलिशा खोब्रागडे, अॅड.अंकिता वानखेडे आणि श्रीनिधी कडालवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment