Visapur CCTV Demand : बल्लारपूर – विसापूर गावातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सध्या स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि कमालीची असुरक्षितता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावात झालेल्या चोरीच्या घटनेनंतर, नुकत्याच घडलेल्या एका खूनाच्या थरारामुळे संपूर्ण विसापूर परिसर हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले असून, “आणखी एखादा खून किंवा गंभीर अनुचित प्रकार घडण्याची वाट न पाहता गावात तातडीने CCTV कॅमेरे बसवावेत,” अशी जोरदार मागणी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. (चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये ६०० कोटीच्या मशिनी धूळखात)
यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला एक जाहीर निवेदनही सोपवले असून, गावातील प्रत्येक मुख्य चौक, गजबजलेला बाजार परिसर, शाळा, सार्वजनिक ठिकाणे तसेच गावात येण्या-जाण्याच्या प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याची मागणी केली आहे.
Visapur CCTV Demand मागे वाढती गुन्हेगारी
नागरिकांनी आपल्या निवेदनात गावाची सद्यस्थिती मांडताना म्हटले आहे की, विसापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून बाहेरील लोकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, गावात कोणतीही आधुनिक सुरक्षा (Security) यंत्रणा नसल्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यातच रात्रीच्या वेळी गावातील अनेक भागांत अंधार राहत असल्याने संशयास्पद हालचालींमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या घटनांमुळे आधीच चिंतेत असलेल्या नागरिकांचे खूनाच्या घटनेमुळे धाबे दणाणले आहेत. यामुळे अनेक पालक मुलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत असून, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना घबराट पसरली आहे.
या गंभीर समस्येवर बोलताना ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे सोपे होईल, ज्यामुळे चोरी, मारामारी आणि अवैध कृत्यांसारख्या गुन्हेगारी प्रकारांवर वचक बसेल. तसेच, एखादा गुन्हा घडल्यास पोलिसांना वेगाने तपास करणे आणि गुन्हेगारांचा छडा लावणे सुलभ होईल, ज्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा दृढ होऊ शकेल.
निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. गावाच्या भौतिक विकासासोबतच नागरिकांचे रक्षण करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असून, CCTV ही आजच्या काळाची अनिवार्य गरज बनली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अखेर, ग्रामपंचायतीने या विषयावर तातडीने विशेष बैठक आयोजित करावी, आवश्यक निधीची तरतूद करावी आणि गावातील संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी आधुनिक कॅमेरे बसवून सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या या सावटात आता विसापूर ग्रामपंचायत प्रशासन काय आणि किती जलद निर्णय घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.