Chandrapur TB Campaign : चंद्रपूर : क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणे व त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच क्षय (TB)रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणे, या उद्देशाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि. 29) क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतला. सद्यस्थिातीत जिल्ह्यात एकूण 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
क्षयरोग (TB) अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. संकेत नांदेकर, अशासकीय सदस्य प्रशांत विघ्नेश्वर, हरीश मंचलवार आदी उपस्थित होते. (चालू कुलरमध्ये पाणी भरताय थांबा आधी हि सूचना वाचा)
Chandrapur TB Campaign अंतर्गत 345 ग्रामपंचायती टीबीमुक्त
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, क्षयरुग्णांना लोकसहभागातून पोषण आहार किट दिली जाते. हा आहार वयोमानानुसार असणे गरजेचे आहे. ग्रामाीण भागात तसेच झोपडपट्टी व इतर स्लम क्षेत्रात विशेष अभियान राबवून क्षयरुग्ण शोधून काढावे. त्यांच्यावर योग्य उपचार करावेत. वयोगटानुसार रुग्णांची माहिती अपडेट ठेवावी. गर्भवती महिला, लहान मुले यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 क्षयरुग्णांवर उपचार सुरू असून गतवर्षी 1095 रुग्ण उपचाराने बरे झाले आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील 905 पैकी 563 रुग्णांनी पोषण आहार किटसाठी सहमती दर्शविली आहे. यापैकी आतापर्यंत लोकसहभागातून 290 जणांना पोषण आहार देण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हे काम निरंतर सुरू असते. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 345 ग्रामपंचायती टीबीमुक्त झाल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले यांनी सांगितले.
या विषयांवर झाले सादरीकरण : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान, टीबीमुक्त ग्रामपंचायती, क्षयरुग्णांकरीता सामाजिक योजना, सामाजिक संघटनांमार्फत क्षयरुग्णांना देण्यात आलेली मदत, टीबीमुक्त जिल्हा करण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम यादी विषयांवर सादरीकरण करण्यात आले.