चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर वन विभागाच्या सावली वनपरिक्षेत्रातील राजोली राखीव जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. (चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांची अहिल्यानगरला बदली)
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी नियमित गस्त घालत असताना कक्ष क्रमांक ३१४ मध्ये त्यांना एका वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले.
वाघिणीचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे शवविच्छेदन करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, वाघिणीचा मृत्यू सुमारे ३० दिवसांपूर्वी झाला असावा. तसेच ही वाघीण वयस्क असल्याचेही वन विभागाने सांगितले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, मृत वाघिणीचे सर्व अवयव अखंड अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे शिकारीचा प्रकार नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी वन विभागाने सखोल तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक (ACF) विलास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) विनोद धुवे तपास करत आहेत. पुढील काही दिवसांत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्हा हा वाघांसाठी प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणावर वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाकडून या घटनेचा सखोल तपास करून वाघिणीच्या मृत्यूमागील कारण लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Leave a Comment