News34
चंद्रपूर :- वाघाच्या जंगल सफारीसाठी जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अभयारण्याला 2 भावंडांनी 12 कोटींचा चुना लावल्याची माहिती उघड झाली आहे, याप्रकरणी विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलिसात 2 भावंडाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
देश व जगातील लाखो पर्यटकांना ताडोबा अभयारण्याची भुरळ पडली आहे, जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करीत जंगल सफारी करतात मात्र आता ह्या ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ताडोबा प्रशासनाला तब्बल 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपयांचा 2 भावंडांनी चुना लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन चे प्रमुख अभिषेक ठाकूर व रोहित ठाकूर या दोन भावंडावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यामध्ये करार झाला होता, ऑनलाइन जंगल सफारी बुकिंग चे काम सदर कंपणीद्वारे केल्या जात होते.
काही दिवसांपूर्वी ठाकूर भावंडांच्या my tadoba वेबसाईटवर बंदी आणत शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जंगल सफारी होणार असे ताडोबा प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र ठाकूर भावंडांनी न्यायालयात दाद मागत प्रशासनाच्या निर्णयावर स्टे आणला हे विशेष, सदर प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे.
3 वर्षात कंपणीद्वारे तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपये ताडोबा प्रशासनाला देणे होते, त्यामधून ठाकूर भावंडांनी ताडोबा प्रशासनाला 10 कोटी 65 लाख 16 हजार 918 रुपये दिले मात्र उर्वरित 12 कोटी रुपये दिले नाही.
सर्व्हिस लेवल एग्रीमेंट अंतर्गत ताडोबा व ठाकूर भावंडांमध्ये करार झाला होता मात्र त्यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले होते, ताडोबा प्रशासनाने वर्ष वर्ष 20-2021, 21-2022, 22-2023 व 23-2024 या वर्षाचे ऑडिट केले त्यामध्ये तब्बल 12 कोटी रुपयांची तफावत आढळली, याबाबत दोन्ही भावंडाना उर्वरित रकमेची विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, सचिन शिंदे यांनी शासकीय रकमेची अपहार केल्या प्रकरणी कलम 420 अंतर्गत दोन्ही भावंडावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे कार्यकारी संचालक जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मागील 3 वर्षात याबाबत ऑडिट केल्यावर सदर तफावत पुढे आली, त्या रकमेबाबत विचारणा केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, दोन्ही भावंडांनी मिळून शासनाच्या रकमेचा अपहार केला हे निष्पन्न झाल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आहे, आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते होण्याची शक्यता आहे, शासनाचे पैसे परत न मिळाल्यास त्यांची मालमत्ता कायद्यानुसार जप्त करण्यात येईल.
मागील 3 वर्षात कोट्यवधी रकमेचा अपहार हा ताडोबा प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यांच्या लक्षात का आला नाही? ताडोबा प्रशासनाची इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा हा अपहार झाला कसा? हे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
विशेष बाब म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृह जिल्ह्यात इतका मोठा घोळ बाहेर आल्याने ते या प्रकरणावर काय करणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.