चंद्रपूर : MP Development Fund Maharashtra वाढवून मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी एकत्र येत मोठी मागणी केली आहे. कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. (हे हि वाचा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था, आमदार जोरगेवार नाराज)
लोकसभा मतदारसंघातील शेकडो गावांच्या गरजा भागवण्यासाठी सध्याचा ५ कोटींचा वार्षिक निधी अत्यंत तोकडा पडत आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांची विकासकामे खोळंबली आहेत. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रमुख खासदारांनी मुख्यमंत्र्यांना ५ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
लोकसभा मतदारसंघाचा अथांग विस्तार आणि त्या तुलनेत मिळणारा अत्यंत अपुरा खासदार निधी यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे खोळंबत असल्याने, महाविकास आघाडीच्या खासदारांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
MP Development Fund Maharashtra : ५ कोटींचा वार्षिक निधी नेमका का ठरतोय अपुरा?
सध्या खासदार निधीअंतर्गत वर्षाला केवळ ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो, जो एका मोठ्या मतदारसंघातील शेकडो गावांच्या विकास गरजा भागवण्यासाठी अत्यंत तोकडा पडत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रस्ते, पायाभूत सुविधा व इतर नागरी कामे करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असून, राज्य शासनाने आपल्या विविध योजनांमधून लोकप्रतिनिधींना पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे खासदारांनी निदर्शनास आणून दिले.
छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात मविआ खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
या समस्येवर तोडगा म्हणून खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ५ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास निधीच्या वार्षिक बजेटमधून १० टक्के निधी खासदारांच्या शिफारशीनुसार देण्यात यावा ही मुख्य मागणी आहे. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पातून सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना आणि केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-दोन रस्ते व विकासकामे खासदारांच्या शिफारशीनुसार मंजूर करण्याची विनंती करण्यात आली आहे, तसेच राज्य परंपरेनुसार बजेट अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांची बैठक घेण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे,खासदार बळवंत वानखेडे आणि खासदार शामकुमार बर्वे यांच्या प्रमुख स्वाक्षऱ्या असून, लोकप्रतिनिधींच्या या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य सरकारने यावर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






