Bacchu Kadu farmers protest : चंद्रपूर, महाराष्ट्र (२३ सप्टेंबर २०२५): राज्यात सततची नापिकी आणि यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान पाहता, सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये भाव द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास २८ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. खांबाडा येथे आयोजित चक्काजाम आंदोलनादरम्यान ते बोलत होते.
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली. त्यांनी अनेक प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:
कडू यांनी सांगितले की, दरवर्षीची नापिकी आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यलो मोजाक रोगामुळे हातात आलेले सोयाबीनचे पीक पिवळे पडून पूर्णतः नष्ट झाले आहे. Bacchu Kadu Chandrapur
या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन, जर सरकारने शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही, नुकसान भरपाई दिली नाही आणि 'सातबारा कोरा' केला नाही, तर येत्या २८ ऑक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यात मोठे चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
यावेळी नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात किशोर डुकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन मते यांच्यासह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती.
Leave a Comment