Chandrapur Air Pollution : चंद्रपूर :– चंद्रपूर शहरातील तुकूम प्रभागातील नागरिकांना वाढत्या वायू प्रदूषणामुळे गंभीर त्रास सहन करावा लागत असून, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता विजय राठोड यांना निवेदन दिले. चंद्रपूर येथील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जानगर या वीज प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. (आमदाराच्या आरोग्यासाठी चंद्रपूरकर एकटवले, महाकाली मंदिरात आरती)
या संदर्भात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष,तथा नगरसेवक तुकूम प्रभाग १ सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक अनिल दडमल, माजी नगरसेवक पुरुषोत्तम राऊत, भाजयुमोचे महामंत्री सुमित बेले, भाजप अध्यात्मिक आघाडीचे महामंत्री सुधाकर टिकले तसेच नारायण पतंगे यांनी मुख्य अभियंता विजय राठोड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करणे, अस्तित्वात असलेल्या यंत्रणांची नियमित देखभाल (देखभाल व दुरुस्ती) करणे तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांचा वाढता त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तुकूम परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये काळ्या धुळीचे कण येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले असून, तुकूम प्रभागातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात; अन्यथा नागरिकांच्या हितासाठी आंदोलनाचे शस्त्र उभारण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Leave a Comment