News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या राजोली येथील फ्रेंड्स कॉलनीत बियर बार सुरू होत असल्याबद्दलची माहिती ग्राम पंच्यायत राजोलीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी फ्रेंड्स कॉलनीतील नागरिकांनी लेखी अर्जाद्वारे दिली. आणि संपूर्ण राजोली वाशियांची तारांबळ उडाली.
गावात असो वा हद्दीत बियर बार सुरू करण्यात येऊ नये गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी विद्यार्थी दारूच्या आहारी जातील गाव बिघडेल भविष्यात गाव गावासारखे शांत राहणार नाही. यासाठी ग्राम पंचायतीने दिनांक २३/८/२०२३ रोजी दुपारी १२ वाजता ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेत विषय क्रमांक ७/१ नुसार मौजा राजोली येथील फ्रेंड्स कॉलनीत सुरु होत असलेल्या बियर बारची परवानगी नाकारण्यात यावी. याविषयावर चर्चा करतांना ग्राम पंचायतीने आतापर्यंत कोणत्याही बियर बारला कुठलीही परवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. अशी माहिती सभेला उपस्थित असलेल्या अनेक ग्रामस्थांना देण्यात आली. असे असताना सुद्धा परत फ्रेंड्स कॉलनीमध्ये सदरचा बियर बार सुरु होऊ नये, यासाठी बियर बारची परवानगी नाकारण्यात यावी.
याबाबतचे पत्र तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात यावे असे ठरविण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूरही करण्यात आला. असे असताना देखील राजोली ग्राम पंचायत हद्दीत मुजोरीने स्वामी गोल्डन बार अँड रेस्टॉरंट व स्वामी गार्डन बार अँड रेस्टॉरंट असे दोन बार सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. मौजा राजोली गावाला पूर्वीपासूनच राजकीय वारसा लाभलेला असून गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील जरी असले तरी सुद्धा अजूनही गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखली जात आहे.
पक्षीय मतभेद सोडले तर गावाच्या हितासाठी, नागरिकांच्या कल्याणासाठी आजही गाव एक होतांना दिसून येत आहे. गावात तंटे,भांडण कमी प्रमाणात आहेत. आणि पुढेही गाव असेच शांत व सुव्यवस्थित राहावे अशी संपूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे.
यासाठी आदर्श ग्राम पंचायतीने दिनांक २९/२०२३ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांना लेखी पत्र ग्रामसभेच्या ठरावानुसार फ्रेंड्स कॉलनीतील सुरु होत असलेले बियर बार ची परवानगी त्वरित रद्द करण्यात यावी आशयाचे पत्र ग्रामस्थांच्या वतीने व हितासाठी राजोली ग्राम पंचायतीचे सरपंच जितेंद्र लोणारे यांनी दिले आहे.