राज्याची दैनावस्था हे सरकारचे अपयश – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

News34

चंद्रपूर – राज्यात फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता स्थापन करून जनतेचा विश्वासघात करणारे सत्ता काबीज करताच जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. राज्यात आज महागाई, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान, शेतकरी आत्महत्या अशा ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या असताना सरकार मात्र सत्तेच्या मदमस्तीत गुरफटून आहे.

सरकारच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच राज्याची दैनावस्था झालेली असून हे सरकारचे स्पेशल अपयश आहे .पक्षश्रेष्ठींनी मला विरोधी पक्षनेते पदी नेमून जी संधी दिली यातून जनसेवेकरिता सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.

विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा स्थानिक मतदार संघातील व्याहाड (खुर्द) येथे प्रथम आगमना प्रित्यर्थ भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर शिक्षक मतदार संघ आमदार सुधाकर अडबाले, माजी आ. डॉ .नामदेवराव उसेंडी, डॉ. नामदेव कीरसान, धनराज मुंगले,माजी जि प. उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जि प. सभापती दिनेश चीटनूरवार, रोहित बोम्मावार, नरेशजी सुरमवार, राजेश सिद्धम, नितीन गोहने, रमाकांत लोधे ,स्वप्निल कावळे, सौ लता लाकडे, संदीप पुण्यपवार, उषाताई भोयर, सीमा सहारे, कवडूजी कुंदावार, विजय कोरेवार, राजू रेड्डी, निखिल सुरमवार, व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महिला आघाडीच्या पदाधिकारी ,युवक काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी व्याहाड (खुर्द) येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कर्तुत्वान व दमदार नेतृत्वाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. आपल्या मनोगतात बोलताना विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, जनतेने मला सदैव प्रेम दिले. तसेच आशीर्वादाच्या रूपातून एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा विरोधी पक्ष नेता पदापर्यंत पोहोचविले.
आज करण्यात आलेला हा बहुमान सत्कार जीवनातील एक अविस्मरणीय क्षण राहील असेही ते यावेळी म्हणाले. सध्या राज्याच्या राजकीय स्थितीत संपूर्ण कलुशीतता आलेली असून कालपर्यंत विरोध करणारे आज सत्तेत मिसळून गुणगान गात आहे. महाराष्ट्रातील थोर महात्म्यांचा तसेच राष्ट्रपितांचा अवमान करणाऱ्यांना सरकारकडून मुभा मिळत असून राज्यात अनेक ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या  आहेत. राज्यातील जनता ही त्रस्त झाली असताना घटलेला विकासदर, वाढलेली महागाई शेतकऱ्यांची हाल अपेष्टा यावर तोडगा काढण्यात सरकार स्पेशल अपयशी ठरत आहे.
देश वाचवायचा असेल तर काँग्रेस एकमेव पर्याय असून महाविकास आघाडीच्या समर्थनात मैदानात उतरा असे आवाहन करत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देखील दिली. व्याहाड (खुर्द) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची स्तुती करत हा जीवनातील अविस्मरणीय सत्कार असल्याचेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. आयोजित कार्यक्रमास सावली  तालुक्यातील हजारोंच्या कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!