Ballarpur Crime Gang : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात सातत्याने गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या एका कुख्यात टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी मोक्कासदृश कडक कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीतील प्रमुख म्होरक्यासह त्याच्या दोन साथीदारांना चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून तब्बल १ वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. (एकाच वेळी ४ महिलांवर वाघाचा हल्ला)
चंद्रपूर पोलिसांची तडीपार कारवाई Ballarpur Crime Gang
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये टोळी प्रमुख बादल वसंता हरणे (वय २२ वर्षे, रा. श्रीराम वार्ड, बल्लारपूर), त्याचा साथीदार यासिन अहमद सिद्दीकी (वय २९ वर्षे, रा. सुभाष वार्ड, बल्लारपूर) आणि योगेश शंकर येरोल (वय २६ वर्षे, रा. रवींद्र वार्ड, बल्लारपूर) यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध खून, दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी ही टोळी सक्रिय होती. विशेष म्हणजे, भक्कम आर्थिक पाठबळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सदस्यांची साथ यामुळे या टोळीच्या मनात कायद्याचा कोणताही धाक उरला नव्हता. यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, मात्र त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे बल्लारपूर आणि आसपासच्या परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. Ballarpur Crime Gang
नागरिकांची सुरक्षितता आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अखेर पोलिसांनी हे अत्यंत कठोर पाऊल उचलले. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड आणि गुन्हे शोध (डी.बी.) पथकाने अत्यंत चोखपणे पार पाडली. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.