चंद्रपूर: (Chandrapur Drugs Seizure) चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तपासादरम्यान आणि विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याची मोठी मोहीम चंद्रपूर पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या एकूण ५१ गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेल्या ६६ लाख १४ हजार ८८६ रुपये किमतीच्या अंमली पदार्थांचा सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्णतः नाश करण्यात आला आहे. मादक पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. (पोलीस अधीक्षकांचा आदेश, चंद्रपुरात डीजे बंद)
मादक पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यातील वेगवेगळ्या ५१ गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या जप्त साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी माननीय जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती यांच्याकडून रीतसर परवानगी मिळवण्यात आली.
Chandrapur Drugs Seizure: ५१ गुन्ह्यांतील जप्त साठा पूर्णपणे खाक
कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० जुलै २०२६ रोजी या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या धडक कारवाईत ३१० किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची किंमत ५३ लाख २ हजार ४८६ रुपये आहे, तसेच १३ लाख ५ हजार रुपये किमतीची ४२० ग्रॅम एम.डी. पावडर आणि ७ हजार ४०० रुपये किमतीची ७६ ग्रॅम गर्द असा एकूण ६६ लाख १४ हजार ८८६ रुपयांचा अमली साठा विल्हेवाटीसाठी निश्चित करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेला हा संपूर्ण मादक साठा अतिशय कडक सुरक्षेत आणि शासकीय वाहनांच्या माध्यमातून नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये (MIDC Butibori) नेण्यात आला.
तेथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ (Plot No. CHW-01) या प्रकल्पात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया पार पडली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, प्रदूषण टाळण्यासाठी अत्याधुनिक बॉयलर प्रणालीच्या साहाय्याने हा सर्व अंमली साठा भट्टीमध्ये सुरक्षितपणे जाळून खाक करण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक पद्धतीने हाताळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदरची मोठी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि प्रभारी गृह उपअधिक्षक (मुख्यालय) पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
या मोहिमेत नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार अरुण खारकर, पोलीस हवालदार सुधीर मत्ते, पोलीस कॉन्स्टेबल किशोर वकाटे, प्रदीप मडावी, अमोल साबे, फोटोग्राफर पोलीस कॉन्स्टेबल वैभव पत्तीवार, चालक पोलीस हवालदार प्रमोद डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश बारशिंगे आणि शुभम बल्की यांनी या संपूर्ण विल्हेवाटीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन कामगिरी चोख बजावली.
चंद्रपूर पोलीस प्रशासनाने या कारवाईनंतर नागरिकांना आश्वस्त केले आहे की, समाजात अमली पदार्थांचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलीस दल अत्यंत गंभीर आहे. भविष्यातही अंमली पदार्थांची तस्करी, साठा आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध अशीच सातत्याने कठोर मोहीम राबवली जाणार असून, अधिक प्रभावी उपाययोजना पुढेही सुरूच राहतील, असा निर्धार पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






