चंद्रपूर : Chandrapur Revenue Lok Adalat: चंद्रपूर जिल्ह्यात प्रलंबित महसुली आणि अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू होत आहे. ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अंतर्गत हे वाद सामंजस्याने मिटवले जातील.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवली जाणार आहे. अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसील स्तरावर एकाच दिवशी सुनावणी होईल. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. (हे हि वाचा – जिल्हा परिषद शाळेत पाण्याची टंचाई)
Chandrapur Revenue Lok Adalat: प्रलंबित दाव्यांवर जलद तोडगा
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली व अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने त्वरीत निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनातसुध्दा चंद्रपूर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार आणि मंडळ स्तरावर 7 ऑक्टो व 4 डिसेंबर 2026 रोजी आणि 17 फेब्रुवारी 2027 रोजी ‘महसूल लोक अदालत’ घेण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तीन टप्प्यांत होणार महसूल लोक अदालत
अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत (चंद्रपूर, बल्लारपूर, मुल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना, राजुरा आणि जिवती) तर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमूर अंतर्गत (चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही) येथे तसेच चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी आणि राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार (कोठारी, तळोदी आणि भिसी) तसेच मंडळ स्तरावर महसूल लोक अदालतीचे आयेाजन करण्यात आले आहे.
अशी राहील प्रक्रिया : 1) सुनावणीचे वेळी तडजोड योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यांवर अंतिम आदेश पारीत करून प्रकरण कायमस्वरुपी निकाली काढण्यात येईल 2) महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान मध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रकरणांची सुनावणी ही एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिका-यांचे आवाहन : वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांची महसूल संदर्भात प्रकरणे असतील, त्या नागरिकांनी अधिवक्त्यांमार्फत या महसूल लोक अदालतीमध्ये सदर प्रकरणे ठेवावी. अधिवक्त्यांनी सुध्दा पुढाकार घेऊन आपसी तडजोडीची प्रकरणे महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढावी. जेणेकरून पक्षकांराचा वेळ आणि पैसा वाचेल व प्रकरण निकाली निघाल्याचे समाधान पक्षकारांना मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






