india post electric vehicle initiative : मुंबई ३ डिसेंबर (News३४) : मुंबईतील नागरिकांना शेवटच्या टप्प्यातील वितरण सेवा अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पार्सलच्या संख्येत झालेली वाढ आणि वितरणाची उत्पादकता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, इंडिया पोस्टने पारंपरिक पायी वितरणाऐवजी 'स्मार्ट मोबिलिटी'चा नवा पर्याय स्वीकारला आहे.
ई-वाहनाद्वारे होणार जलद वितरण
इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने 'स्मार्ट मोबिलिटी इनिशिएटिव्ह' अंतर्गत, टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्स (TVS VMS) च्या सहकार्याने टपाल वितरकांसाठी (पोस्टमन/पोस्टवूमन) इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण सेवा प्रणाली सुरू केली आहे.
पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उपक्रम
या उपक्रमांतर्गत, एकूण २११ इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे सुरळीत, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर संचालन सुनिश्चित करण्यासाठी टपाल कार्यालयांमध्ये समर्पित चार्जिंग स्टेशन्स (Charging Stations) देखील बसविण्यात आले आहेत.
४ डिसेंबर रोजी शुभारंभ
हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता चाकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून सुरू केला जाईल. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री. अमिताभ सिंग, इंडिया पोस्ट, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालिका श्रीमती काया अरोरा आणि टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Leave a Comment