चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा कहर! शेतकऱ्याला केले ठार

January 17, 2026 by Prakash Hande

Man-animal conflict Chandrapur news : चंद्रपूर/नागभीड - 25 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : तालुक्यातील तळोधी (बाळापूर) जवळील आकापूर (Akapur) शेतशिवारात आज, शनिवार (२५ ऑक्टोबर), सकाळी एका धक्कादायक घटनेत वाघाने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतला. वाघाच्या हल्ल्यातील ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. 

 

Also Read : झोपडपट्टी मधील मुलांसोबत आमदार मुनगंटीवार यांनी साजरी केली दिवाळी


वासुदेव लक्ष्मण वेठे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शुक्रवार (दि. २४) सायंकाळी आपल्या धान पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी रात्रभर शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. अखेर, आज शनिवारी सकाळी शेताच्या एका बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरील वाघाच्या स्पष्ट खुणांवरून हा हल्ला वाघानेच केल्याचे वनविभागाने प्राथमिकदृष्ट्या निश्चित केले आहे.

 

वनविभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप

या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्याभरापासून या आकापूर शेतशिवारात वाघाचे प्रस्थ होते. नागरिकांनी वारंवार तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला लेखी निवेदन देऊन या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
मात्र, वन विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. फक्त पाहणी करण्याशिवाय कॅमेरे बसविणे किंवा पिंजरे लावणे यासारख्या प्रभावी उपाययोजना वन विभागाने केल्या नाहीत, असा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.

 

वनअधिकाऱ्यांना घेराव, मृतदेह उचलण्यास नकार

घटनेची माहिती मिळताच तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी शहा मॅडम आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू असतानाच संतप्त गावकऱ्यांनी वनअधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत शहा मॅडम यांना घेराव घातला.


जोपर्यंत नागरिकांना सुरक्षिततेची ठोस हमी दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून उचलण्यास नागरिकांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे वृत्त लिहीपर्यंत (सकाळी/दुपारी) मृतदेह घटनास्थळीच पडून होता, अशी माहिती आहे. वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागभीड आणि चंद्रपूर (Chandrapur) परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

यावर्षीचा 35 वा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 31 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट तर अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एका नागरिकांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

+