Wardha River Search; घुग्गुसजवळ वर्धा नदीत पोहायला गेलेली पाच मुले बेपत्ता?

चंद्रपूर – Wardha River Search प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेली पाच मुले सायंकाळपर्यंत घरी परतली नसल्याने पालकांनी शोधमोहीम सुरू केली. नदीकाठावर मुलांचे कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने नदीत बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले असून पावसामुळे आणि अंधारामुळे कारवाईत अडथळे येत आहेत. (अवैध धंद्यावर धडक कारवाई, ५ कोटींचा मुद्देमाल जप्त)

Wardha River Search वर्धा नदीकाठी मुलांचे कपडे आणि मोबाईल कसे सापडले?

जिल्ह्यातील घुग्गुस शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा नगर भागातील पाच मुले ८ जून रोजी दुपारच्या सुमारास म्हातारदेवी समोरील चांदूर गावातील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेली होती. मात्र, सायंकाळ उलटूनही मुले घरी परत न आल्याने घाबरलेल्या पालकांनी सर्वत्र शोध सुरू केला. शोध घेत असताना वर्धा नदीच्या काठावर मुलांचे कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने मुले नदीत बुडाल्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी आणि नागरिकांनी घुग्गुस पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाला पाचारण करून नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्रीची वेळ, घनदाट अंधार आणि त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत कोणाचाही पत्ता लागला नसल्याने आता ९ जून रोजी पहाटेपासून पुन्हा मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जाणार आहे.

नदीत नेमके किती जण बुडाले याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ज्यांची मुले रात्रीपर्यंत घरी पोहोचली नाहीत, ते चिंताग्रस्त पालक तातडीने घटनास्थळी धाव घेत आहेत. सध्या घटनास्थळावर मुसळधार पाऊस सुरू असून, पोलीस विभागाची चमू सुरक्षेच्या कारणास्तव परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे संपूर्ण घुग्गुस शहरावर शोककळा पसरली असून मुले सुखरूप मिळावीत यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Comment