इको प्रो चा वाघ-अधिवास सत्याग्रह

News34 chandrapur

चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इको-प्रो ने वरोरा-चिमूर मार्गावरील वहानगाव शेतशिवारात जाऊन “वाघ अधिवास सत्याग्रह” आंदोलन केले. ही सत्याग्रह करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबा मधील प्रसिद्ध वाघ असलेले बंजरंग आणि छोटा मटका यांच्या झुंज झालेली होय, या झुंजीत बंजरंग वाघ मृत झालेला होता. ही झुंज कोर, बफर च्या बाहेर वनक्षेत्र बाहेर शेतशिवारात झालेली होती. हा अधिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने तसेच वाघाचा वावर आज जंगलाच्या बाहेर असून, वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे. वनविभागाने योजना राबविताना फक्त बफर आणि कॉरिडॉर वनक्षेत्रचा विचार न करता “वाघ अधिवास जिथे, वनविभागाच्या योजना तिथे” अशी मागणी करीत ‘वाघ अधिवास सत्याग्रह’ करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे, यात मागील पाच वर्षात शेकडो मनुष्यहानी वाघसह अन्य वन्यप्राणीच्या हल्ल्यात झालेली आहे. मनुष्यहानी म्हणजेच संघर्ष नसून शेतकरीचे शेतपिक नुकसान, पाळीव जनावरे मारली जाणे, वाघाच्या भीतीच्या वातावरणात राहणे आदी अनेक समस्या संघर्षास कारणीभूत आहेत. वाढती वाघाची संख्यामुळे एकीकडे पर्यटन विकास तर दुसरीकडे मानव वन्यप्राणी संघर्ष अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे.

 

वाढते वन्यप्राणी सर्वत्र वाघ वावर यामुळे स्थानिक गावकरी-शेतकरी कायम संकटात राहणे, आणि त्रासाला सामोरे जाणे अशी परिस्थिती असताना मात्र विविध योजनेचा लाभ मात्र बफर आणि कॉरिडॉर मधील क्षेत्रातील गावाचा विचार करणे कितपत योग्य आहे? आज वाघाला कुठलीही सीमा नाही, तो जंगलाच्या बाहेर शेतशिवारात असतो, गावालगत असतो, शहरात सुद्धा असतो, विविध उद्योगाच्या क्षेत्रात असतो तेव्हा त्याचा वावर जिथे असतो तिथे संघर्ष आणि समस्या निर्माण होतात. मात्र ठराविक भागातील गावात वनविभागाच्या योजनेचा लाभ दिला जातो, यात धोरणात्मक बदल होणे आवश्यक आहे.

 

चंद्रपूर शहरालगत असलेली गावात चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र मधील वाघ लगतच्या सात-आठ गावात महिना-दोन महिने वावर असल्याने तिथे बफर, कॉरिडॉर नसताना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा लाभ देत त्या गावाचा समावेश करण्यात आला. मात्र जिल्ह्यात तीनही वनविभाग अंतर्गत शेकडो गावे आहेत जे वाघाच्या दहशतीखाली आहेत, या भागात वाघ-मानव संघर्ष निर्माण झाल्यास लोकडाऊन सारखी परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गावांना “वाघ तिथे योजना” संकल्पना राबवून सर्वाना समान लाभ देण्याची मागणी करण्यात आली.

 

वाघ-अधिवास सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्या

सोबतच या सत्याग्रह आंदोलनातून शेतपिक नुकसान भरपाई देण्याची वनविभाग, कृषी विभाग व महसूल विभाग असा तिघाडा न ठेवता सरळपणे एकाच विभागाकडे जवाबदारी सोपवावी. प्रत्येक क्षेत्रातील पाळीव जनावरे वन्यप्राणी हल्ल्यात मृत झाल्यास बफर च्या धर्तीवर लवकरात लवकर देण्यात यावे, परिसरातील सिंचन व्यवस्था व शेतीची वीज यांची वेळ दिवसा असावी, वाघ-मानव संघर्ष बाबत राज्यशासनाने गठीत केलेली समितीचा अहवाल नुसार कार्यवाही त्वरित करावी, वाघ अधिवास क्षेत्र असलेल्या लगतच्या सर्व गावात पिआरटी गठण आणि त्यांचे मानधन नियमित देणे, या सर्व गावातील शेतकरी करिता सौरऊर्जा कुंपण त्वरित देणे, कॉरिडॉर नसलेल्या भागात वनक्षेत्रालालगतच्या शेतीला कायम स्वरूपी कुंपण घालणे आदी मागण्या वाहणगाव येथे करण्यात आलेल्या “वाघ-अधिवास सत्याग्रह” आंदोलनातून शाशनाकडे करण्यात आलेली असून या मागण्याकरिता येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडू धोतरे यांनी दिला आहे.

 

आज करण्यात आलेल्या आंदोलनात इको-प्रो चे अध्यक्ष तथा माजी मानद वन्यजीव रक्षक, माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ चे माजी सदस्य बंडू धोतरे यांचे नेतृत्वात कुणाल देवगिरकर, धमेंद्र लुनावत, राजू काहिलकर, सुधीर देव, सचिन धोतरे, राहुल कुचनकर, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, प्रकाश निर्वाण, अमोल दौलतकर, प्रितेश जीवने, चित्राक्ष धोतरे सहभागी होते, यावेळी वहाणगाव येथे स्थानिक गावकरी यांना या सत्याग्रह विषयी, “वाघ तिथे वनविभागाच्या योजना” या विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती देत येत्या काळात करण्यात येणाऱ्या आंदोलन विषयी माहिती दिली, यावेळी स्थानिक गावकरी मध्ये सरपंच प्रशांत कोल्हे, उपसरपंच हरिभाऊ दडमल, शंकर नन्नावरे, गजानन गायकवाड, शेतकरी सुधाकर दडमल, तानाजी सावसाकडे, सुभाष दोडके, राजू कुळमेथे, पांडू दोडके यावेळी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!