News34 chandrapur
चंद्रपूर – संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थी आपल्या भविष्याला घेऊन चिंतेत आहेत. याबाबत आम आदमी पक्षाकडे महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. तलाठी भरतीच्या निकालाने हा गैरप्रकार समोर आलेला आहे. सोबतच अनेक परीक्षा केंद्रांवर घोळ होतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थी तथा पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन पाठवले आहे. या निवेदनात आम आदमी पक्षाने खालील मागण्या केल्या आहेत:
* तलाठी भरतीची नुकतीच प्रसिद्ध केलेली गुणवत्ता यादी संशयास्पद असल्याने ती तात्काळ रद्द करावी.
* तलाठी भरतीत ज्या उमेदवारांच्या गुण 200 पैकी 150 पेक्षा जास्त आहेत त्यांच्या ज्ञानाची पुनर्तपासणी करून नव्याने गुणवत्ता यादी प्रकाशित करावी.
* तलाठी भरती गैरप्रकाराची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी.
* स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे.
* उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्यासाठी असलेले शुल्क कमी करावे.
* पोलीस विभागात नवीन पदभरती लवकर जाहीर करावी.
या मागण्यांवर लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाने केली आहे.
या निवेदनावर आम आदमी पक्ष युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव ॲड. तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, अनुप तेलतुंबडे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर इत्यादी उपस्थित होते.