Ballarpur Missing Girl : 13 वर्षीय मुलगी बेपत्ता

बल्लारशाह (चंद्रपूर): Ballarpur Missing Girl प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. बल्लारपूर येथील 13 वर्षीय विद्यार्थिनी घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (बाळ विक्री प्रकरणातील आरोपीला अटक)

Ballarpur Missing Girl प्रकरण नेमके काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर शहरातील ही घटना बुधवारी (३ जून २०२६) रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. पीडित मुलगी इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी घराशेजारी असलेल्या एका कार्यक्रमात जेवणासाठी जात असताना, तिने नातीला सोबत येण्यास सांगितले. मात्र, तिने ‘तू पुढे जा, मी नंतर येते’ असे म्हणून आजीला पुढे पाठवले. आजी जेवण करून परत आल्यानंतर तिने नातीला आवाज दिला, परंतु घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूचा परिसर, नातेवाईक, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि तिच्या मैत्रिणींकडे शोध घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर, आपल्या अल्पवयीन नातीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर कुटुंबीयांनी ४ जून रोजी पहाटे बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

बेपत्ता मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे: रंग निमगोरा, उंची ५ फूट २ इंच, बांधा सडपातळ, चेहरा लांबट, नाक सरळ आणि केस काळे व लांब आहेत. बेपत्ता झाली तेव्हा तिच्या अंगावर सिमेंट रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाची पॅन्ट होती.

या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मदन भानुदास दिवटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Comment