चंद्रपूर – (Chandrapur General Meeting) संदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेची ३ जुलै रोजी होणारी सर्वसाधारण सभा अचानक रद्द करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. गटनेते शेखर शेट्टी यांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय मागे घेऊन नियोजित सभा पूर्ववत घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय चर्चेविना रखडले आहेत. (बाळ विक्री प्रकरणात आमदार जोरगेवार गप्प का? प्रतिमा ठाकूर यांचा सवाल)
चंद्रपूर महानगरपालिकेची ३ जुलै रोजी होणारी सर्वसाधारण सभा अचानक रद्द करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असून, त्यामुळे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी हिरावली गेली आहे. प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन नियोजित सभा पूर्ववत घ्यावी, अशी मागणी महानगरपालिकेतील गटनेते शेखर शेट्टी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Chandrapur General Meeting : सर्वसाधारण सभा रद्द का करण्यात आली?
शेखर शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात शहराच्या विकासाशी व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय समाविष्ट होते. मात्र, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेता पदासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत संपूर्ण सभा रद्द करण्यात आली. प्रत्यक्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजेंड्यातील केवळ विषय क्रमांक २२ वरच स्थगिती दिली असून, इतर कोणत्याही विषयावर किंवा इतर पक्षांच्या स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेवर कोणतीही स्थगिती नाही, असे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि अपक्ष सदस्यांच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण होऊ शकत होती. अशा परिस्थितीत संपूर्ण सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय हा कायद्याच्या तरतुदींना धरून नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शेट्टी यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एकदा बोलावलेली सर्वसाधारण सभा काही कारणास्तव होऊ शकत नसेल, तर ती पुढे ढकलता येते; मात्र ती संपूर्णपणे रद्द करण्याची तरतूद नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय निवडणूक प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असून, तो एकतर्फी व बेकायदेशीर आहे.
सर्वसाधारण सभा ही केवळ राजकीय नियुक्त्यांसाठी नसून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी असते. न्यायालयाने केवळ एका विषयाला स्थगिती दिली असताना, इतर सर्व जनहिताचे विषय बाजूला ठेवून संपूर्ण सभाच रद्द करणे म्हणजे चंद्रपूरच्या नागरिकांचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शेखर शेट्टी यांनी केली आहे. तसेच नागरिकांच्या हितासाठी रद्द करण्यात आलेली सर्वसाधारण सभा तातडीने पूर्ववत घेऊन प्रलंबित जनहिताचे विषय मार्गी लावावेत, अशी विनंती त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगर सेवकांची उपस्थिती होती.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






