चंद्रपूर – Dadasaheb Gaikwad Yojana अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत आतापर्यंत 46 लाभार्थ्यांना 140.32 एकर शेतजमीन वाटप करण्यात आली आहे. 100 टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असून त्यांच्या उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण झाले आहे. (शेतकऱ्यांना मिळणार २५ लाखांचे अनुदान, योजनेचा लाभ घ्या)
अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भुमिहीन कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या राहणीमानात बदल होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभगाच्यावतीने २००४ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरिकांना कसण्यासाठी शेतजमीन वाटप केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ गरजुंना १४०.३२ एकर शेतजमीन शासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
Dadasaheb Gaikwad Yojana म्हणजे काय?
सुरवातीला या योजनेत ५० टक्के शासकीय अनुदानावर भुमिहिन शेतमजुरांना योजनेचा लाभ देण्यात येत होता. जमिनीची ५० टक्के किंमत लाभार्थ्यांना द्यावी लागत होती. कालांतराने या योजनेत सुधारणा करण्यात आली. त्यानुसार आता या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भुमिहीन कुटुंबांना कसण्याकरीता ४ एकर जिरायती किंवा २ एकर बागायती जमीन खरेदी करून १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते. याकरीता शेतजमीन विक्रीस तयार असलेल्या भु-धारकाकडुन जिरायती जमिनीसाठी कमाल ५ लक्ष रूपये व बागायतीसाठी कमाल ८ लक्ष रूपये प्रती एकर पर्यंतच्या दराने शेतजमीन खरेदी करण्यात येते.
योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत चंद्रपुर जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील ४६ लाभार्थ्यांना ३२.९७ एकर बागायती व १०७.३५ एकर जिरायती अशी एकूण १४०.३२ एकर शेतजमीन वाटप करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर जमीन कसून लाभार्थ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेबाबत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येऊन तहसीलदारांना शेतजमीन मिळवून देण्याबाबत कळविण्यात येते. तसेच समता दुतांमार्फत गावागावांमध्ये योजनेची माहिती देऊन जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जातो. या अनुषंगाने लाभार्थी भेटी, जमीन विक्रीस तयार असलेल्या मालकांशी संवाद साधून प्रस्ताव घेण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी सांगितले.
लाभार्थ्यांसाठी निकष : १) अर्जदार हा अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील भुमिहीन शेतमजुर असायला हवा. २) अर्जदार हा अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्रय रेषेखालील असावा. ३) अर्जदाराचे किमान वय १८ व कमाल वय ६० वर्षे इतके असावे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
