Ganeshotsav Mandal Competition organized by Maharashtra Government details and prizes

चंद्रपुरात गणेश मंडळांना सुवर्णसंधी: राज्यस्तरीय स्पर्धेत मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे, मनपाचे सहभागाचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 20, 2026

चंद्रपूर: Ganeshotsav Mandal Competition राज्य शासनाच्या वतीने जाहीर झाली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या राज्य महोत्सवाची घोषणा केली आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ही स्पर्धा राबवली जात आहे.

यंदा स्पर्धेची व्याप्ती थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवण्यात आली आहे. विजेत्या मंडळांना लाखो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. चंद्रपूर शहरातील नोंदणीकृत गणेश मंडळांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील अतिक्रमणावर चालला मनपाचा हातोडा)

राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या महोत्सवांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेची व्याप्ती तालुका व जिल्हास्तरापासून थेट राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढविण्यात आली असून, चंद्रपूर शहरातील सर्व नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावरील बक्षिसांचे संपूर्ण स्वरूप

या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना विविध स्तरांवर रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले जाणार आहे. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय क्रमांकास ४० हजार व तृतीय क्रमांकास ३० हजार रुपये, तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. याव्यतिरिक्त, जिल्हास्तरावरून राज्यस्तरासाठी शिफारस झालेल्या उर्वरित ३३ मंडळांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

१०० गुणांच्या मूल्यमापनाचे ५ मुख्य निकष कोणते?

स्पर्धेचे मूल्यांकन १०० गुणांच्या निकषांवर आधारित असेल, ज्यामध्ये प्रत्येकी २० गुणांचे पाच प्रमुख विभाग निश्चित करण्यात आले आहेत. यात गायन, वादन, नृत्य, नाट्य, पोवाडा, लावणी, झाडीपट्टी, शिल्पकला व लुप्त होणाऱ्या कलांचे संवर्धन (२० गुण); दुर्मिळ नाणी व शस्त्र प्रदर्शन, कवी संमेलन, पुस्तक मेळा, निबंध स्पर्धा आणि पारंपरिक देशी खेळांचे आयोजन (२० गुण); गडकिल्ले, वने, स्मारकांचे जतन व स्वच्छता जनजागृती (२० गुण); महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग घटकांसाठी उपक्रम, शासकीय योजनांचा प्रसार, आरोग्य व अंधश्रद्धा निर्मूलन कार्य (२० गुण); तसेच पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली मूर्ती व सजावट, भाविकांसाठी प्राथमिक सुविधा, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम आणि मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ३० टक्के महिलांचा सहभाग (२० गुण) यांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागासाठी अनिवार्य अटी व शर्ती

या स्पर्धेत केवळ अधिकृतरीत्या नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळेच सहभागी होऊ शकतील. इतर मंडळांना संधी मिळावी यासाठी मागील सलग दोन वर्षे राज्य किंवा जिल्हास्तरावर पारितोषिक विजेती ठरलेली मंडळे यंदा पारितोषिकासाठी पात्र नसतील. तसेच मंडळांनी केलेल्या कार्याचा कालावधी हा मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंतचा ग्राह्य धरला जाईल. पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment