चंद्रपूर :- Mahavitaran Electricity Theft Action अंतर्गत वीज चोरांवर आता थेट व कठोर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महावितरणने अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे. आता अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांचे नाव आणि पत्ता थेट सार्वजनिक केला जाईल. महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
चंद्रपूर परिमंडळात गेल्या पाच महिन्यांत तब्बल सव्वा कोटी रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. (हे हि वाचा – वर्धा बल्लारशाह रेल्वे वेळापत्रकात बदल)
Mahavitaran Electricity Theft Action : वीज चोरांची माहिती होणार सार्वजनिक
वीज चोरी करणाऱ्यांनो, सावधान! आता वीज चोरी करताना आढळल्यास तुमचे नाव आणि पत्ता सार्वजनिक केला जाणार आहे. प्रत्येक वीज जोडणीवर लक्ष ठेवण्याचा दावा करत महावितरणने वीज चोरीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरण संचालक धनंजय औंढेकर यांचे कडक निर्देश
महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी कंपनीच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतची घोषणा केली. वीज चोरी सारख्या गंभीर गुन्ह्याला आळा घालणे आवश्यक असून, त्यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे महावितरणने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर आणि प्रभावी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि यंत्रणांना या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वीज चोरीचा दुष्परिणाम प्रामाणिक ग्राहकांवर होतो, असे महावितरणचे म्हणणे आहे. चोरीमुळे होणाऱ्या महसुलाच्या नुकसानीची भरपाई इतर प्रामाणिक ग्राहकांना करावी लागते. याशिवाय, वीज चोरीमुळे शॉर्टसर्किट, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड किंवा आग लागण्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. अशा घटनांमुळे महावितरणचे नुकसान तर होतेच; शिवाय जीवघेणा अपघातही होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यावर महावितरणने भर दिला आहे.
- प्रामाणिक ग्राहकांचा सन्मान: वीज चोरी हा सामाजिक अपराध असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. यामुळे आर्थिक नुकसानासह अपघातांचाही धोका असतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सन्मान केला जाईल, तर वीज चोरी करणाऱ्यांची माहिती समाजासमोर आणली जाईल.
- प्रयत्नानंतरही अंकुश नाही: महावितरणच्या विविध प्रयत्नानंतरही वीज चोरीवर अंकुश बसलेला नाही. चंद्रपूर परिमंडळात गेल्या पाच महिन्यात ९१२ ठिकाणी १ कोटी २५ लाख रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. महावितरणची विभागनिहाय ते प्रादेशिक स्तरापर्यंत भरारी पथके तैनात असतानाही वीज चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. इतकेच नव्हे, तर स्मार्ट मीटर बायपास करूनही वीज चोरी केली जात असल्याचे आढळून आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






