मूल (चंद्रपूर): mul burglary crime प्रकरणी मूल शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. (हे हि वाचा – क्रूर पित्याने ८ वर्षीय मुलाची केली हत्या)
बाधित नागरिक कुटुंबासह बाहेर गेले असताना ही घटना घडली. यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.
या घटनेनंतर मूल पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या या चोरीचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूल येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील रहिवासी सतीश रामचंद्र आनंदवार हे आपल्या मुलीवर उपचारासाठी कुटुंबासह चंद्रपूर येथील कोलते रुग्णालयात गेले होते. तेथून ते पुढील कामासाठी राजुरा येथे गेले होते. दरम्यान, त्यांच्या घराशेजारीच भाड्याने राहणारे गोवर्धन नागागौडा नाथी हे देखील ९ ऑगस्टच्या सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह तेलंगणा येथे गेले होते. १० ऑगस्टच्या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गोवर्धन नाथी कुटुंबियांसह परत आले असता, त्यांना त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले व तेथे ठेवलेले २० हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता शेजारी राहणाऱ्या सतीश आनंदवार यांच्याही घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तातडीने सतीश आनंदवार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली.
सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह ७० हजारांची चोरी
माहिती मिळताच सतीश आनंदवार यांनी राजुरा येथून थेट मूल येथील आपले घर गाठले. घरात प्रवेश केला असता कपाट तोडून चोरट्याने घरातील मौल्यवान ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. कपाटात ठेवलेला १५ हजार रुपये किमतीचा ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, २५ हजार रुपयांची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ९ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बिऱ्या आणि १ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे चांदीचे चाळ असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे स्पष्ट झाले. ९ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजेपासून ते १० ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेच्या कालावधीत ही चोरीची घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी सतीश आनंदवार यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी विजय रामकृष्ण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश शंकर कन्नाके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ऐन गर्दीच्या वस्तीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






