संस्कृतीचा समृध्द मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याची गरज – आमदार किशोर जोरगेवार

News34 chandrapur

चंद्रपूर – डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार त्यांनी केलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरी पेशात असणाऱ्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी ख-या अर्थाने रुग्णसेवा केली. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आयोजित केलेले भजन संमेलन त्यांना आपण वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहेच सोबतच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याचा संकल्प त्यांच्या जयंती दिनी आज आपण करुया असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम श्री गुरुदेव सेवा शहर शाखा चंद्रपूर च्या वतीने लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त भव्य भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वाधीकारी गुरुकुंज आश्रम मोझरी चे लक्ष्मणराव गमे दादा, भागवताचार्य मनिषजी महाराज, गुरुकुंज आश्रम मोझरी चे उपसर्वाधीकारी दामोधर पाटील दादा, गुरुकुंज आश्रम मोझरी चे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ, प्रांताधिकारी विठ्ठलराव सावरकर, जिल्हा सेवाधिकारी अॅड. दत्ता हजारे, अशोक चरडे, जिल्हा प्रचार प्रमूख रुपलाल कावळे, जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार, राम राउत, अंकुश आगलावे, डॉ. गोपाल मुंधडा, प्रेमलाल पारधी, अॅड. किरण पाल, वासुदेव सादमवार बबनराव धर्मपूरीवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

 

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, अध्यात्माकडुन दुरावत चाललेल्या समाजाला भजन किर्तनातून आध्यात्माचे महत्व आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृतीचे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केल्या जात आहे. चांगल्या समाजाच्या निमिर्तीसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक काम करत आहे. आपल्या वतीने समाजाच्या शेवटच्या भागापर्यंत भजन किर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोहचविण्याचे काम केल्या जात असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.

 

आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भजन महोत्सवाला सुरवात केली आहे. या महोत्सवात विविध भाषीय भजन मंडळे मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत. विशेषत: लहान मुलांचे भजन मंडळेसुध्दा यात सहभागी होत आहे ही विशेष बाब असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अनेक भजन मंडळांकडे भजनासाठी लागणारे साहित्य नाही. त्यामुळे काही मंडळांना आपण ते उपलब्ध करुन दिले आहे.

 

भजनातून मानवातील नकारात्मकता नष्ट होऊन त्याच्यात सकारात्मकता निर्माण होते. इच्छाशक्ती प्रबळ होते. मनातील वाईट वृत्तीचा नाश होतो. त्यामूळे भजन – किर्तनाची आजही समाजाला गरज असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक भजन मंडळांची व नागरिकांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!