शेतकऱ्याच्या कष्टावर फिरवलं पाणी! १६ क्विंटल कापूस राख, मूल तालुक्यातील घटना

February 20, 2026 by Prakash Hande

Chandrapur Farmer News : मूल (चंद्रपूर) - तालुक्यातील लालहेटी गावातील शेतकऱ्याचे १६ क्विंटल कापूस अज्ञाताने जाळल्याची घटना १८ फेब्रुवारीला घडली, याबाबत पीडित शेतकऱ्याने मूल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अज्ञाताने १६ क्विंटल कापूस किंमत १ लाख २८ हजार रुपये जाळल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. (लघुशंकेला उतरला आणि दुचाकी चोरी, चंद्रपूर मूल मार्गावरील प्रकार)

 

लालहेटी गावातील शेतकरी ४२ वर्षीय नोमाजी चुधरी यांच्याकडे १० एकर शेती आहे, त्यावर ते कापूस पिकवितात, यावर्षी सुद्धा त्यांनी शेतात कापसाची पराटी लावली होती, मागील ३ महिन्यापासून शेतकरी चुधरी यांनी शेतातील कापूस पिंजून काढत त्यांच्या बांधकाम सुरु असलेल्या नवीन घराच्या रूममध्ये ठेवले होते.

 

१८ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजता चुधरी यांची पत्नी आरडाओरडा करीत होती, घरचा कापूस जळत असल्याची माहिती पत्नीने दिल्यावर ते सरळ बांधकाम सुरु असलेल्या नवीन घराकडे गेले मात्र आगीचे रौद्र रूप पाहता ते आत जाऊ शकले नाही. पाण्याचा पंप सुरु करीत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले पण तोवर कापूस पूर्णतः जळून खाक झाला. Cotton Fire Incident

 

घटना घडण्याच्या आदल्या दिवशी रात्री चुधरी यांनी कापूस व्यवस्थित असल्याचे बघितले होते, मात्र सकाळी कुणी अज्ञातांनी कापसाला आग लावली असा संशय त्यांनी व्यक्त केला, याबाबत शेतकरी चुधरी मूल पोलीस स्टेशन गाठत अज्ञातांविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Leave a Comment

+