leopard road accident : चंद्रपूर - अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै रोजी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२१ आणि १२२ च्या मध्ये घडली, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप मडावी, कर्णेवाड, क्षेत्रसहायक रुपाली आडे, आक्सापूरचे पोलीस पाटील सूरज वैरागडे, उपसरपंच चंद्रजित गव्हारे आणि गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. leopard road accident
चंद्रपुरात मेफेड्रोन ची विक्री, २ आरोपीना अटक १ पसार
क्षेत्रसहायक रुपाली आडे यांनी पंचनामा केला असता, मृत बिबट्या तीन ते चार वर्षांचा नर असून, त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केली होती. अपघातामुळे त्याच्या शरीरातून रानडुकराचे मांस बाहेर आलेले दिसत होते. झरण वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी यांनी सांगितले की, मृत बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात येणार असून, शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
या घटनेमुळे परिसरातील वन्यजीव सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आक्सापूर गावाजवळ आणि शेतात वाघाचे दर्शन झाल्याने तसेच वाघाचे पाऊलखुणा (पगमार्क) आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांना १४ जुलै रोजी निवेदनही देण्यात आले होते. शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेतीची कामे करत आहेत, तर वानरांमुळे वेलवर्गीय आणि फळबागा वाचवणेही कठीण झाले आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी मांडली आहे. highway animal crossing danger zones

नुकतेच कान्हाळगावला अभयारण्य घोषित करण्यात आले असल्याने, हा परिसर वन्यप्राण्यांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग बनला आहे. यामुळे रस्त्यावर वन्यप्राण्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभाग, महामंडळ आणि शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष आणि वन्यजीव संरक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.
Leave a Comment