"काय आहे महावितरणचे 'शून्य अपघात' मिशन?

February 13, 2026 by Prakash Hande

Lokesh Chandra MSEDCL : चंद्रपूर :  विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देत ‘शून्य विद्युत अपघात’ उदिद्ष्टासाठी महावितरणने राज्यातील उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाची सुरवात विद्युत सुरक्षा शपथेने करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे नुकतेच दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (१६ फेब्रुवारीला चंद्रपुरात महिला लोकशाही दिन)


 
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शून्य विद्युत अपघात उद्दिष्टाची प्रभावी व सातत्याने अंमलबजावणी करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी विद्युत सुरक्षेबाबत उपाययोजना व लोकसहभागातील उपक्रमांना वेग दिला आहे. ‘अभियंते व कर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षा ही केवळ नियमावली नसून दैनंदिन कामाचा एक भाग आहे. प्रत्येक जीव मौल्यवान असल्याने 'शून्य विद्युत अपघात' हेच महावितरणचे ध्येय आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेचे कायम तंतोतंत पालन करावे’, असे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.

 


विद्युत सुरक्षेबाबत सजग व सतर्क राहावे यासाठी महावितरणच्या 664 उपविभाग व 3291 शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवार हा सुरक्षा दिवस ठरविण्यात आला आहे. प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्यातील कामाच्या पहिल्या दिवशी या दोन्ही कार्यालयातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी सकाळी कामाची सुरुवात सुरक्षा शपथेने करीत आहे. त्यानंतर सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणे व तांत्रिक साधनांची तपासणी करण्यात येत आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच क्षेत्रीय कामांना सुरुवात होत आहे. 

 


यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत आयोजित सर्व बैठकींची सुरवात देखील विद्युत सुरक्षा शपथेनेच करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरक्षा अधिकारी म्हणून मंडलस्तरावर कार्यकारी अभियंता (प्रशासन) आणि विभागस्तरावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्यावर देण्यात आली आहे.


केंद्रीय विद्युत प्राधीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महावितरणने कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या विद्युत सुरक्षेसाठी विविध उपाययोजना व उपक्रमांना मोठी गती दिली आहे. जून 2025 मध्ये महावितरणच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल 2 लाख 11 हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह 2 कोटी 85 लाख वीजग्राहकांना विद्युत सुरक्षेचा थेट वैयक्तिक संदेश देण्यात आला. Lokesh Chandra MSEDCL

 

या अभियानाची जागतिकस्तरावर नोंद घेण्यात आली. तसेच सुरक्षितपणे देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना महावितरणकडून 20 ते 25 प्रकारचे वैयक्तिक व कॉमन सुरक्षा साधने देण्यात येतात. ही सुरक्षा साधने आवश्यकतेनुसार व मागणीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यासाठी स्वतंत्र ‘टी अॅण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

Leave a Comment

+