१९ मार्चपासून महाकाली मातेचा जागर! चंद्रपुरात लाखो भाविक येणार; प्रशासनाने आखली 'विशेष रणनीती'!

March 06, 2026 by Prakash Hande

Mahakali Yatra 2026 : चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. (कांग्रेस गटनेत्याला कारणे दाखवा नोटीस)

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, महाकाली मंदीर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे, मुख्य पुजारी गजाननराव चन्ने आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरीता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे त्यांना मंदीर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणा-या सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजे. गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी. बाहेर जिल्ह्यातून येणा-या बसेसची संख्या किती राहील, सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील, त्यांची पार्किंग कुठे केली जाईल, आदी बाबींचे योग्य नियोजन करावे. नियंत्रण कक्ष, कॉल सेंटर, पोलिस चौकी, अग्निशमन व्यवस्था 24 बाय 7 उपलब्ध ठेवावी.

 

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच मंदीर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता, तेथे पाण्याची उपलब्धता ठेवावी. मंदीर परिसरात विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अखंडीत सुरू असले पाहिजे. जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. तसेच येणा-या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे, मोबाईल क्रमांक नमुद करावा. महानगरपालिका प्रशासन, पोलिस विभाग, वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांनी तात्काळ मंदीर परिसराची पाहणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

2 Comments

1 month ago

या महाकाली मातेच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात माता भगिनी दर्शनासाठी येतात त्यांना त्यांच्या गावातील प्रमुख 5 समस्या व त्यावर त्यांच्या सूचना याचा सर्वे करण्यात आला व त्यावर विविध शासकीय योजनांची सांगड घालून पुढील वर्षासाठी कृती कार्यक्रम केला तर उत्तमच होईल. यामध्ये त्यांचाही सहभाग योजना राबविताना घेऊन लोकाभिमुख प्रशासन होऊ शकते. तसेच व्यसनाधिनता कमी करण्यासाठी गावागावात सार्वभौम ग्रामसभा घेऊन महिला ग्राम रक्षक दल व तरुणांचे ग्रामरक्षक दल तयार केले तर उत्तमच होईल. तंटा मुक्त समित्या पुन्हा एकदा सक्रिय केल्या तर उत्तमच होईल.

1 month ago

या महाकाली मातेच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात माता भगिनी दर्शनासाठी येतात त्यांना त्यांच्या गावातील प्रमुख 5 समस्या व त्यावर त्यांच्या सूचना याचा सर्वे करण्यात आला व त्यावर विविध शासकीय योजनांची सांगड घालून पुढील वर्षासाठी कृती कार्यक्रम केला तर उत्तमच होईल. यामध्ये त्यांचाही सहभाग योजना राबविताना घेऊन लोकाभिमुख प्रशासन होऊ शकते. तसेच व्यसनाधिनता कमी करण्यासाठी गावागावात सार्वभौम ग्रामसभा घेऊन महिला ग्राम रक्षक दल व तरुणांचे ग्रामरक्षक दल तयार केले तर उत्तमच होईल. तंटा मुक्त समित्या पुन्हा एकदा सक्रिय केल्या तर उत्तमच होईल.

Leave a Comment

+