महापौर आमचाच! संदीप गिर्हे यांच्या भूमिकेने चंद्रपुरात काँग्रेस-भाजपची धाकधूक वाढली.

January 31, 2026 by Prakash Hande

Sandip Girhe Shiv Sena : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात एकाही पक्षाला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नाही, पण कांग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. महानगरपालिकेच्या ६६ जागेपैकी कांग्रेस २७, भाजप २३, शिवसेना ६, वंचित २, जनविकास सेना ३, एआयएमआयएम १, शिंदेसेना १, अपक्ष २ व बसपा १ जागेवर जिंकून आली. कांग्रेस पक्षाजवळ जनविकास सेना असे पकडून ३० जागा, सत्तास्थापनेसाठी कांग्रेस पक्षाला केवळ ४ जागा हव्या. जागेची जुळवाजुळव करण्यापूर्वी कांग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी वाढली. कांग्रेसचे २७ नगरसेवक २ गटात विभागल्या गेले असून यामध्ये धानोरकर-वडेट्टीवार या गटाचा अंतर्गत संघर्ष सुरु आहे. (महापौर चंद्रपूर, कांग्रेस नगरसेवकांची पळवापळवी)

महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया १० फेब्रुवारीला पार पडणार आहे, शिवसेना-वंचित ने विभागीय आयुक्त कार्यालयात गट स्थापन करीत कांग्रेस व भाजपला धक्का दिला आहे. सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षाला शिवसेनेची गरज भासणार आहे पण महापौर आमचा अशी अट शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी ठेवल्याने दोन्ही पक्षासमोर अडचणी वाढल्या आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पाठिंबा मिळावा याकरिता चर्चा केली मात्र ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचा महापौर व्हावा अशी इच्छा व्यक्त करीत पुढील चर्चा जिल्हाप्रमुख गिर्हे सोबत करावी असे सांगितले.

सध्या शिवसेना भाजप व कांग्रेस दोन्ही पक्षासोबत चर्चा करीत आहे. पहिली अडीच वर्षे आमचा महापौर मग पुढील अडीच वर्षे तुमचा महापौर असा सत्ता वाटपाचा फॉर्मुला पुढे केला. कांग्रेस पक्षासोबत जवळपास अंतिम चर्चा झाली मात्र अगोदर महापौर कुणाचा यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. भाजप वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे. कांग्रेस पक्षात नगरसेवकांच्या पळवापळवी चा प्रकार सुरु असल्याने सध्या चर्चेला विराम मिळाला आहे. कांग्रेस पक्षाने शिवसेनेला अडीच वर्षाचा महापौर व अडीच वर्षे स्थायी समिती सभापती असा फॉर्मुला दिला मात्र आधी कोण? यावर दोन्ही पक्षाचे घोडे अडकले आहे. Sandip Girhe Shiv Sena

कांग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीमधील घटकपक्ष आहे, तर पाठिंबा आम्हाला मिळणार असा संभ्रम कांग्रेस पक्षाला आहे. मनपा निवडणुकी पूर्वी शिवसेनेने कांग्रेसला १५ जागांची मागणी केली होती. त्यावेळी कांग्रेस पक्षाने आश्वासनाचा हात दाखविला होता. आता पाठिंब्यासाठी कांग्रेस आपल्या हातात शिवसेनेची मशाल धरू पाहत आहे पण शिवसेना मशाली चा उजेड कमळावर पाडण्याच्या पुढाकार घेत असल्याचे चित्र सध्यातरी आहे. सत्तेच्या जवळ आल्यावर कांग्रेस पक्षात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. सत्ता स्थापन झाल्यावर चित्र असेच कायम असणार त्यामुळे चंद्रपूर मनपात स्थिर सरकार मिळणार नाही करिता शिवसेना काही वेगळा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता आहे.

Leave a Comment

+