तर शिक्षकदिनी 2 मुली पोरक्या झाल्या नसत्या

News34 teacher day 2023

चंद्रपूर – शिक्षक दिनाच्या 1 दिवसाआधी शहरातील चंद्रपूर-नागपूर मार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांचा ट्रक च्या धडकेत मृत्यू झाला. त्या लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

त्यांच्या मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात दुखाचं वातावरण पसरलं, त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? रस्ते अपघातात नाहक बळी गेलेल्या शिक्षिका या आपल्या दुचाकीवर रस्त्याच्या बाजूने जात होत्या, भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने त्यांना मागून धडक देत फरफटत नेले.

सकाळी झालेल्या अपघातानंतर शहरात सायंकाळी पुन्हा 2 अपघात झाले त्यामध्ये 2 व्यक्ती ठार झाले व 1 गंभीर जखमी आहे, 4 सप्टेंबर हा चंद्रपूर शहरातील अपघात वार ठरला, एकूणच दिवसभरात 3 अपघात घडले त्यामध्ये तिघांचा नाहक बळी गेला.

सुट्टीचा अर्ज टाकून त्या शाळेत जायला निघाल्या….

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जिप व मनपा च्या शाळांमधील आरटीइच्या निकषानुसार आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधेची पडताळणी सोमवारी पासून करण्यात येणार होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेत पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, बांधकाम विभाग व शिक्षण विभाग सदस्य सचिव उपस्थित राहणार आहेत अश्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी दिल्या होत्या.

सर्व शाळांनी भौतिक सुविधा (RTE नुसार) नीट व व्यवस्थित असल्याची खात्री करून परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था व इतर सुविधा परिपूर्ण व व्यवस्थित करून घ्यावेत.

या कामात हयगय होता कामा नये. शाळा तपासणी स.9 वाजेपासून करण्यात येणार आहे. सर्वांनी शाळेत 9.00 वाजता उपस्थित राहावे.असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाचे होते. सोमवारी अनिताने सुट्टी घेण्याचा बेत आखला होता.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तिने तसा अर्जही लिहिला,परंतु ‘शहरालगत शाळा असल्याने टीम आपल्याच शाळेत आली तर .? या चिंतेत तिने अर्ज लिहूनही शाळेत जाण्याचा निर्णय घेतला,परंतू काळाने तिच्यावर झडप घातली.

अनिताच्या मृत्यूनंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या धास्तीची चर्चा शिक्षकवृंदात आहे. त्या टीमच्या धाकामूळे अनिता शाळेत गेली नसती तर,तिच्या 2 मुली शिक्षकदिनापूर्वी पोरक्या झाल्या नसत्या.अशीही एक चर्चा आहे.

चंद्रपूर विधानभेचे तत्कालीन आमदार नाना श्यामकुळे यांनी पडोली ते बंगाली कॅम्प पर्यंत उड्डाणपूल निर्माण व्हावा यासाठी पाठपुरावा करीत निधी मंजूर केला होता, त्या उड्डाणपूलाने शहरातून जाणारी जड वाहतूकिला बायपास म्हणून तो सोपा पर्याय होता मात्र राजकीय उदासीनतेमुळे तो उड्डाणपूल कागदावर राहिला.

शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांची संख्या व अरुंद होणारे रस्ते ही चिंतेची बाब झाली आहे, शहरातील शाळा व महाविद्यालय यांची सुट्टी झाली की अल्पवयीन बाईक रायडर्स चा धुमाकूळ बघायला मिळतो, ही आता नित्याचीच बाब झाली आहे.

सकाळच्या सुमारास अल्पवयीन बाईक रायडर्स ची संख्या जास्त प्रमाणात रस्त्यावर बघायला मिळते, आज अल्पवयीन बालकांच्या हाती दुचाकी देण्याची फॅशन पालकांनी सुरू केली आहे, ती जर थांबली तर शहरात होणारे अपघात काही प्रमाणात कमी होतील.

चंद्रपूर शहरात वाढणाऱ्या ट्रॅफिक जॅम ची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, जटपुरा गेटवर दररोज वाहतूक व्यवस्था खोळंबते, यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र ते सर्व फोल ठरले.

चंद्रपूर जिल्ह्यातील मंत्री असो की स्थानिक आमदार त्यांनी फक्त मर्यादित कालावधीसाठी जटपुरा गेट च्या वाहतुकीचा मुद्दा उचलला, पण ठोस उपाययोजना काही झाली नाही.

राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे आज अनेक समस्या चंद्रपुरात उदभवल्या आहे, त्या भविष्यात कधी सुटणार की नाही ही येणारी वेळ सांगेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!