जादूटोणा विरोधी कायद्याबाबत नागरिक अनभिज्ञ

News34

चंद्रपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादूटोणाविरोधी कायद्याला राज्यात दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने राज्यव्यापी जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून, या यात्रेच्या माध्यमातून या कायद्याची राज्यभरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी मंगळवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला दहा वर्ष पूर्ण होत आहे. तर त्यांच्याच पुढाकारातून अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याला दहा वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अजूनही या कायद्याविषयी नागरिक अनभिज्ञ आहेत. अनेकांना या कायद्याची माहिती नाही. त्यामुळे जादूटोण्याची प्रकरणे पुढे येण्याचे प्रमाण कमी आहे.

 

या कायद्याविषयी नागरिकांत जनजागृती करण्यासाठी २० ऑगस्टपासून पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा काढण्यात आली असून, ९० दिवसांचा हा दौरा असणार आहे. अशी महिती नंदिनी जाधव यांनी दिली. संपूर्ण जिल्ह्यातून ही यात्रा काढण्यात येणार असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालये तसेच काही गावांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. दहा वर्षांनंतरही अनेकांना या कायद्याची माहिती नाही अशी बाब या यात्रेदरम्यान पुढे आली.

चंद्रपुरात 5 सप्टेंबर ला अंनिस ची जनसंवाद यात्रा दाखल झाली असून जिल्ह्यातील विविध भागात अंनिस चे कार्यकर्ते जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करणार आहे.

आतापर्यंत राज्यात केवळ १२ गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाल्याची माहिती जाधव यांनी यांनी दिली. पत्रकार परिषदेला रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, रवींद्र तिराणिक, अविनाश टिपले, शशिकांत मोकाशी, दशरथ वाघमारे, भीमलाल साव, डॉ. राहुल साळवे, नागेश पेटकर, गंगा हस्ते आदी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!