चंद्रपूर : Chandrapur Maha Walkathon उपक्रमाला चंद्रपूर शहरातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (हे हि वाचा – चंद्रपुरात गॅस चोरीचा भांडाफोड)
चांदा क्लब ग्राऊंड येथून पहाटे सुरू झालेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले. उपस्थितांनी जलसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे (21 ऑगस्ट) औचित्य साधून जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाला चंद्रपूरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
चांदा क्लब ग्राऊंड ते जटपुरा गेट: असा होता वॉकेथॉनचा मार्ग
सकाळी 6 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथून सुरू झालेल्या ‘महा वॉकेथॅान’ मध्ये विद्यार्थी, युवक, विविध संघटनांचे सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी चांदा क्लब ग्राऊंड, जुना वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेटवरून परत प्रियदर्शनी चौक आणि चांदा क्लब ग्राऊंडवर समारोप करण्यात आला.
महा वॉकेथॉनमधील विजेते: जीवनदास चहारे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
या वॉकेथॉनमध्ये प्रथम क्रमांक जीवनदास चहारे यांनी पटकविला. त्यांना पदक, सन्मानचिन्ह आणि 5 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक असशर पठाण (पदक, सन्मानचिन्ह आणि 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक पुनम प्रजापती (पदक, सन्मानचिन्ह आणि 2 हजार रुपये) यांनी पटकाविला. यासोबतच स्पर्धेतील इतर सात जणांना स्मार्ट वॉच, पदक आणि सन्मानचिन्ह तर दोन जणांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
पाण्याची पातळी धोक्याच्या स्तरावर: निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार म्हणाले, स्व. सुधाकरराव नाईक यांनी जलसंवर्धन या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. पाणी हे जीवन आहे, मात्र त्याच्या संवर्धनाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. पाण्याची पातळी धोक्याच्या स्तरापर्यंत आली आहे. आता त्याचे संवर्धन नाही केले तर भविष्यकाळ धोकादायक असणार आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल. तसेच माती आणि पाणी संवर्धनात आपले आयुष्यभर योगदान राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकातून मृत व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता निलिमा मंडपे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांची आज जयंती आहे. राज्य शासनाने त्यांच्या जयंतीनिमित्त जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचे संपूर्ण राज्यात आयोजन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार चंद्रपूर येथे या कार्यक्रमाचे आयेाजन होत आहे.
स्व. सुधाकरराव नाईक यांनी दुष्काळ परिस्थितीवर मात करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमाला प्रोत्साहन देऊन जलसंधारणाला महाराष्राकरच्या विकासाच्या केंद्रस्थानी आणले. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे केवळ घोषवाक्य नसून भविष्याची गरज आहे. निसर्गाने आपल्याला माती आणि पाणी ही अमुल्य देणगी दिली आहे. आज जलसंकट गंभीर होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडविणे, जलस्त्रोतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
तत्पुर्वी उपस्थितांना जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्याम हेडावू यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता निलिमा मंडपे, उपअभियंता मोहन बलकी, श्री. खंडाईत, क्रीडा अधिकारी नंदू आवारी आदी उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






