ajit pawar condolence meeting : चंद्रपूर - राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात शनिवारी ३जानेवारीला सायंकाळी सहा वाजता गांधी चौक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वपक्ष, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. (उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन)
अजित पवार यांचे विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली नेतृत्व मानले जात होते. त्यांनी राज्याच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यांच्या नेतृत्वशैलीची दखल राजकीय वर्तुळात घेतली जात होती. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूरात आयोजित करण्यात येणाऱ्या श्रद्धांजली सभेला सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून मौन पाळण्यात येणार असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे - शनिवारी मुंबईत शपथविधी कार्यक्रम असल्याने ही सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा रद्द करण्यात आली आहे.
Leave a Comment