Maharashtra Budget 2026 : चंद्रपूर - ६ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले, या अर्थसंकल्पावर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून सत्ताधारी पक्षासाठी चांगला तर विरोधी पक्षासाठी वाईट अश्या संमिश्र प्रतिक्रिया आमदार खासदार यांच्यातर्फे देण्यात आल्या आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करून सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देणाऱ्या कर्जमाफीसारख्या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून लाखो शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे राहण्याची संधी मिळेल.
लोकाभिमुख निर्णयांनी समृद्ध असा राज्याचा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून मांडलेला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त समिती स्थापन करणे, संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणे तसेच बाबासाहेब आंबेडकर शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उभारण्याची घोषणा ही सामाजिक व सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणारी आहे. तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून स्मारक व नागरी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा ही त्यांच्या योगदानाचा गौरव करणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अर्थसंकल्पातील विविध योजना आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यालाही मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण रस्त्यांचा विकास, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, नैसर्गिक शेती अभियान, उद्योगांना चालना देणारे धोरण तसेच विदर्भातील औद्योगिक व पर्यटन विकासाच्या योजनांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात रोजगारनिर्मिती आणि विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा, हजारो किलोमीटर रस्ते व पूल, मुंबई–पुणे जलदगती ट्रेन, मेट्रो व द्रुतगती मार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. शेती क्षेत्रात अॅग्रीस्टॅक, फार्मर आयडी, एआयचा वापर, नैसर्गिक शेती अभियान तसेच शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. Vidarbha Budget Allocation
नवीन गुंतवणूक धोरण, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग केंद्र, सौरऊर्जा प्रकल्प, बांबू विकास आणि गडचिरोली स्टील हब यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी भरीव तरतूद केल्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला बळ मिळेल. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा सकारात्मक व लोकाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
हा राज्याचा अर्थसंकल्प नसून उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी मांडलेला MMRDA चा अर्थसंकल्प होता, तसेच हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा? काँग्रेस विधिमंडळ यांची विजय वडेट्टीवार यांची सरकारवर उपरोधिक टीका
मुंबई, दि. ६: आज विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता, यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी टोला लगावला.
या अर्थसंकल्पातील मुख्य त्रुटींवर बोट ठेवताना विजय वडेट्टीवार यांनी
हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि MMR क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही, अस वडेट्टीवार म्हणाले.
२०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, पण आज हे कर्ज वाढले आहे.हे सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
सरकारच्या या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना वडेट्टीवार म्हणाले,
तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!
महाराष्ट्राला गतीने पुढे नेणारा सर्वसमावेशी अर्थसंकल्प - हंसराज अहीर
चंद्रपूर : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय व विकासाची दृष्टी असलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 या वर्शासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला असून तो सर्वसमावेशी व राज्याच्या सर्वंकष विकास साधणारा व विकसित महाराष्ट्राची संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प असल्याचे मत पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले आहे.
राज्याची प्रगती, शाश्वत विकास, सर्वांना न्याय व लोकाभिमुख सुशासन ही या अर्थसंकल्पाचे प्रमुख चार स्तंभ असून शेती, लघु उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, पायाभुत सुविधा तसेच संत व महापुरूषांच्या आदर्श वारस्याचे जतन, संवर्धन करून त्यांच्या विचारांची पेरणी करण्यास भरीव आर्थिक तरतुद करण्यात आलेला हा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी, शेतमजूर, महिला, गौ-पालक, कुकूटपालक, मच्छिमार व अन्य घटकांना दृष्टीपथात ठेवून न्याय दिला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, कापसाचे भाव, पिकविमा आणि पंतप्रधान योजनांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी विकसित भारताच्या स्वप्नपुर्तीसाठी उचललेले महत्वपुर्ण पाऊल असून हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप ठरेल अशी प्रतिक्रीया हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
Leave a Comment